• लेखक dhanashree consultant
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 24-08-2022

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचा अभ्यास कसा करावा?

img-icon

परीक्षेचा अभ्यास कसा करावा: परीक्षा म्हटली की विद्यार्थी जोमाने अभ्यासाला सुरुवात करतात. परंतु फक्त अभ्यासाला सुरुवात करूनच उपयोग होत नाही तर त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची आणि टिप्सची (Preparation-Tips) देखील तेवढीच गरज असते. या ब्लॉगमध्ये आपण Embibe च्या तज्ञांनी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 अभ्यास कसा करावा|Preparation-Tips याबद्दल सांगितले आहे, नक्कीच या टिप्सचा आपल्याला उपयोग होईल असा आमचा विश्वास आहे. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023-परीक्षेविषयी 

परीक्षेविषयी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे वेगवेगळ्या नऊ विभागांच्या अंतर्गत इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे आयोजन केले जाते. बोर्डद्वारे वर्षातून दोन वेळा अंतिम परीक्षा घेतली जाते. प्रत्येक वर्षी, 17 लाखाहून अधिक विद्यार्थी SSC परीक्षेसाठी बसतात. महाराष्ट्र बोर्ड अंदाजे ऑक्टोबर 2022 मध्ये 2022-23 च्या परीक्षेची सूचना जाहीर करणार आहे. शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी तारखांची नोंद घेऊन ठेवली पाहिजे आणि सर्व प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली पाहिजे.

10 वी ची परीक्षा हा प्रत्येकाकरिता एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. 2023 मध्ये 10 वी बोर्डची परीक्षा ही अंदाजे मार्च-एप्रिल या कालावधीत होईल. विद्यार्थी आपल्या शालेय जीवनात पहिल्यांदाच अशा मोठ्या परीक्षेची तयारी करत असतात. परिणामी एक वर्ष पूर्वीपासूनच याची तयारी ही सुरू होत असते. विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे कुटुंबीय देखील अप्रत्यक्षपणे या परीक्षेच्या तयारीमध्ये सहभागी असतात. अशा वेळेस कुटुंबाकडून, आजूबाजूच्या समजाकडून विद्यार्थ्यांवर दडपण येत असते. परंतु अशा वेळेस घाबरून न जाता किंवा कोणताही ताण न घेता आपण आपल्या तयारीवर लक्ष केंद्रीत करणे अधिक गरजेचे असते. विद्यार्थ्यांनी नेमकी किती दिवसांपासून परीक्षेच्या तयारीस सुरुवात करावी? तसेच तयारी नेमकी कशी करावी? यासारख्या इतर प्रश्नांबद्दल जाणून घेण्यास आपल्याला नक्कीच मदत होईल. 

इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा अभ्यास कसा करावा याकरिता काही टिप्स – 

  • आपल्या अभ्यासाची तयारी सुरू करण्यासाठी योग्य वेळ निवडा: 

प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता वेगळी असते म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासाची तयारी कधी सुरू करावी हे आपण सरसकटपणे सर्वांकरिता ठरवू शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी केली नाही किंवा उजळणीस सुरुवात केलेली नाही त्यांनी निराश न होता आपल्या सुरू असलेल्या अभ्यासाबरोबरच पूर्वी शिकलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी करण्यास लवकरात लवकर सुरुवात करावी.

  • उत्तम वेळापत्रक अभ्यासाची तयारी सोपी करेल:

योग्य नियोजनाशिवाय, आपले लक्ष्य गाठणे शक्य नसते. म्हणून SSC परीक्षेच्या अभ्यासाच्या तयारीकरिता, विद्यार्थ्यांनी स्वतःकरिता योग्य असे वेळापत्रक तयार केले पाहिजे आणि उत्तम गुणांकरिता निश्चित केलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. वेळापत्रक निश्चित करताना आपल्या अभ्यासक्रमातील विविध विषयांचा आणि त्यातील टॉपिक्सचा प्राधान्यक्रम ठरवा. प्रत्येक विषयास किती वेळ देणे अपेक्षित आहे हे आपल्या तयारीनुसार ठरवा. आपल्याकडे असलेल्या वेळेचे योग्यप्रकारे विषयानुसार विभाजन करा. अभ्यासाव्यतिरीक्त इतर ॲक्टिव्हीटीसाठी वेळ देण्यास विसरू नका. अंतिमतः आपले मानसिक स्वास्थ्य जर निरोगी असेल तरच आपण आपले ध्येय सहजपणे पूर्ण करू शकतो.

  • स्वयंअध्ययनासाठी पुरेसा वेळ द्यावा: 

शाळा आणि कोचिंग क्लास नंतर विद्यार्थ्यांनी काही ठरावीक असा वेळ स्वयंअध्ययनासाठी देणे अपेक्षित असते. यामध्ये आपल्याला शाळेमध्ये शिकलेल्या विविध टॉपिक्सची उजळणी करावी लागते. स्वयंअध्ययनासाठी पुरेसा वेळ द्यावा जेणेकरून आपण निश्चित केलेले ध्येय साध्य करू शकाल. दोन विविध विषयांच्या अभ्यासामध्ये आपल्या सोयीनुसार 30-45 मिनिटांचा ब्रेक घ्या, आणि आपल्या आवडीनुसार जास्तीत जास्त दोन तासांमध्ये आपले स्वयंअध्ययन विभाजित करा.

  • परीक्षेत उत्तम कामगिरीकरिता अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावा :

बोर्ड परीेक्षेमध्ये उत्तम यश मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास अभ्यासाकरिता महत्त्वाच्या काही सवयी असणे गरजेचे असते, जेणेकरून उत्तम यश मिळवण्यास आपल्याला मदत होईल. अशा वेळेस आपण स्वतः करीता  अभ्यासाची नियमावली बनवून त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. परिणामी सगळ्या विषयांकरिता योग्य तेवढा वेळ दिला जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या नोट्स तयार करा. परीक्षा जवळ आल्यानंतर विद्यार्थ्यांची नोट्स करीता धावपळ होते, ही धावपळ टाळण्याकरिता आपण स्वतःच्या नोट्स तयार ठेवल्यास आपला वेळ वाचून आपल्याला अधिक सराव करण्यास मदत होईल. आपण ठरवलेले वेळापत्रक पुढे ढकलू नका. ज्या दिवशी, ज्या वेळेस, जो विषय निश्चित केलेला आहे त्याचे पालन करा. 

  • दीर्घ उत्तरे लेखनाचा पुरेसा सराव:

दीर्घ उत्तरे लिहिताना विद्यार्थ्यांना नेहमीच ताण येतो. नेमके किती लिहावे, कुठे थांबावे हे समजणे त्यांना थोडे कठीण जाते. कारण दिलेल्या ठरावीक शब्द मर्यादेमध्ये आपल्याला माहीत असलेली सर्व माहिती लिहिणे हे एक कौशल्याचे काम आहे. अशा वेळेस विद्यार्थ्यांनी दीर्घ उत्तर लेखनाचे योग्य असे नियोजन केले पाहिजे. उत्तरामधील महत्त्वाच्या मुद्द्यांकरिता वेगवेगळे परिच्छेद करणे, नमुना प्रश्नपत्रिकांमधील दीर्घ उत्तरांच्या प्रश्नांचा सराव आणि त्यासाठी लागणारा वेळ इत्यादी गोष्टी लक्षात ठेवून उत्तर लेखनाचा सराव करावा. आपण दीर्घ उत्तराच्या लेखनाचा जेवढा सराव कराल, तेवढा प्रश्नाचे उत्तर लिहिताना येणारा ताण कमी होण्यास मदत होईल. 

  • मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे:

विद्यार्थ्यांचा सर्व अभ्यासक्रम आणि उजळणी पूर्ण झाल्यानंतर, त्यांना मागील वर्षांच्या अधिकतर प्रश्नपत्रिका सोडविण्याची शिफारस केली जाते. बोर्डच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे, प्रश्न कोणत्याप्रकारे विचारले जातात, कोणत्या धड्याला किती प्राधान्य दिले जाते हे लक्षात येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कोणत्या विषयामध्ये आपली तयारी पूर्ण झालेली नाही हे देखील समजते. हे पेपर झालेले असल्यामुळे याची नमुना उत्तरे देखील उपलब्ध असतात. त्याचा संदर्भ घेऊन आपण उत्तरे नेमकी कशाप्रकारे लिहावी हे देखील आपल्याला शिकायला मिळते. विद्यार्थ्यांनी किमान मागील 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविण्याची आम्ही शिफारस करतो. 

  • विश्रांतीसाठी नियमित ब्रेक घ्या: 

सलग बराच वेळ अभ्यास करणे टाळा. या ऐवजी, ठरावीक वेळेनंतर ब्रेक घ्या. यामुळे आपल्यावर असलेला ताण कमी होण्यास मदत होईल परिणामी, पुढील अभ्यासाकरिता आपण नव्याने सुरुवात करू शकाल. एकाग्र राहाण्याकरिता याची आपल्याला मदत होते. अशा वेळेस आपण मोकळ्या हवेमध्ये जाऊन एक फेरफटका मारू शकता, ज्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटेल. तसेच एका जागी बराच वेळ बसल्यामुळे आपले शरीर देखील आखडल्यासारखे होते याकरिता 5-10 मिनिटांमध्ये करता येईल असा व्यायाम करा, विशेषतः डोळ्यांचा. सतत एकाच ठिकाणी बघितल्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. मन शांत करण्याकरिता व्यायामासोबतच ध्यान केले पाहिजे. 

  • उत्तरे योग्यरित्या लिहा

ज्या परीक्षेकरिता संपूर्ण वर्षभर मेहनत केलेली असते, त्या मेहनतीस मुख्य बोर्ड परीक्षेमध्ये सत्कार्णी लावणे महत्त्वाचे असते. आपण निश्चित केलेल्या लेखनाच्या नियोजनाप्रमाणे उत्तरे लिहिण्याचा आणि दिलेल्या वेळेमध्ये पेपर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्र बोर्डच्या नियमानुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जाणे अपेक्षित असते. या 15 मिनिटांचा उपयोग पुरेपूर करून घेतला पाहिजे. यामध्ये प्रश्नांचा प्राधान्यक्रम ठरवा. योग्य त्या प्रश्नांना योग्य तेवढीच उत्तरे लिहा. आपल्याला माहीत आहे म्हणून सर्व लिहून आपला वेळ वाया घालवू नका. अनेक प्रश्नांकरिता पर्यायी प्रश्न उपलब्ध असतात. यामध्ये योग्य त्या प्रश्नाची निवड करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. कोणताही प्रश्न सोडू नका. शिक्षण मंडळाच्या नियमानुसार चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जात नसल्यामुळे प्रश्नपत्रिकेत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिल्याची खात्री करा. 

जर विद्यार्थ्यींनी योग्य प्रकारे तसेच योग्य वेळेमध्ये बोर्डच्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन केले तर, आपले निश्चित ध्येय गाठण्यास अधिक सोपे जाऊ शकते. वेळापत्रकाचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहेच, बोर्ड सारख्या महत्त्वाच्या परीक्षेच्या अभ्यासाकरिता देखील वेळापत्रक हे फायदेशीर ठरू शकते. तसेच केवळ वेळापत्रक तयार करून चालणार नाही तर त्याचे काटेकोर पालन करणे अधिक आवश्यक आहे. यासारख्या टिप्स लक्षात घेऊन आपण परीक्षेच्या अभ्यासाची तयारी केली तर आपल्याला उत्तम गुण मिळण्यास नक्कीच मदत होईल. बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला उत्तम गुण मिळाले तर पुढे आपल्या आवडीचे क्षेत्र निवडणे सोपे होते. आपल्या शैक्षणिक जीवनातील इयत्ता 10 वी ची परीक्षा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. म्हणूनच कोणताही ताण न घेता, आत्ता आपण वाचलेल्या preparation tips चे पालन करून अगदी सहजपणे या परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊ शकता. 2023 मध्ये होणाऱ्या SSC परीक्षेकरिता आपल्याला शुभेच्छा!!

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 अभ्यास कसा करावा-वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

प्र1. दररोज किती वेळ अभ्यास करणे अपेक्षित आहे?

उत्तर. शाळेच्या वेळे व्यतिरिक्त आपण किमान तीन तास तरी स्वयं अध्ययनाकरिता वेळ देणे गरजेचे आहे.

प्र2. मुख्य परीक्षेकरिता मी माझे गुण कसे वाढवू शकतो?

उत्तर. नियमित अभ्यास तसेच वर नमूद केलेल्या टिप्सच्या मदतीने आपण परीक्षेतील गुण वाढवू शकता.

प्र3. महाराष्ट्र बोर्डच्या अभ्यासक्रमामध्ये बदल झाला आहे का?

उत्तर. 2022-2023 या वर्षाकरिता महाराष्ट्र बोर्डच्या अभ्यासक्रमामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

प्र4. नमुना प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात का?

उत्तर. नमुना प्रश्नपत्रिका ही सराव करण्याकरिता वापरण्यात येते. या प्रश्नपत्रिकेमुळे मुख्य परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा अंदाज आपल्याला येईल.

प्र5. परीक्षेच्या दृष्टीने विशेष महत्त्वाच्या धड्यांची माहिती मला मिळेल का?

उत्तर. शिक्षण मंडळाने ठरविलेला संपूर्ण अभ्यासक्रम हा परीक्षेकरिता ग्राह्य धरला जातो. म्हणूनच केवळ महत्त्वाच्या धड्यांवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस विद्यार्थ्यांना केली जात नाही.  

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023-काय करावे आणि काय करू नये

विद्यार्थ्यांनी खालील सूचनांचे पालन केले पाहिजे:


काय करावे:

  • परीक्षेची तयारी करताना आपण अभ्यासक्रमाचे संपूर्ण स्वरूप जाणून घेतले पाहिजे.
  • कॉन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजून घेतल्या पाहिजेत.
  • परीक्षा देण्यापूर्वी सूचना व्यवस्थित वाचल्या पाहिजेत.
  • परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी पोहोचले पाहिजे.
  • परीक्षा द्यायला जाताना आपल्यासोबत पेन, पेन्सिल आणि इतर आवश्यक साधने ठेवली पाहिजेत.

काय करू नये:

  • कॉन्सेप्टचे पाठांतर टाळण्याचा सल्ला दिला जातो.
  • वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करताना जुन्या पद्धती किंवा शॉर्टकट वापरणे टाळले पाहिजे.
  • परीक्षा देताना इतरांच्या उत्तरांची कॉपी करणे टाळले पाहिजे.
  • परीक्षा देण्याच्या आधी एकाच प्रश्नाचे कोणतेही नवीन उत्तर वाचू नका.  

आम्हाला अशी आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचा अभ्यास कसा करावा? ” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्याकरिता उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात राहा.

Embibe वर 3D लर्निंग, पुस्तकांची प्रॅक्टिस, टेस्ट आणि शंकांचे निरसन करून आपले सर्वोत्तम ध्येय साध्य करा